लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये चर्चा सुरू आहेत, की ते सुरू होतील की नाही. त्यातच एक क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे वेळोवेळी सोशल मिडीयावर लाइव्ह येऊन शिक्षणाबद्दलच्या अपडेट देत आहेत. मात्र काही गोष्टींमध्ये ताळमेळ नसल्याने राज्यातले उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी बुचकाळ्यात पडले आहेत.
मागच्या आठवड्यात (8 मे 2020 रोजी) उदय सामंत लाइव्ह आले होते आणि त्यांनी घोषित केलं होतं की केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार, बाकीच्या सर्व वर्षाच्या सर्व सत्रातील परीक्षा रद्द होतील. मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेऊन परीक्षेसंदर्भात हा अंतिम निर्णय राहिलं, असं देखील ते म्हणाले होते. मागच्या वर्षीचा 50 टक्के परफॉर्मन्स आणि सुरू असलेल्या वर्षाचा 50 टक्के परफॉर्मन्स पाहिला जाईल आणि विद्यार्थ्यांना पास केलं जाईल. याच्यामध्ये उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या सीईटी परीक्षा काहीही करून होतील, असेही ते म्हणाले.
आज परत उदय सामंत लाइव्ह आले होते आणि त्यांनी त्यात असं नमुद केलं की ज्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्रातल्या परीक्षा होणार होत्या, त्यादेखील रद्द कराव्यात असं आम्ही (UGC - University Grants Commission) विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र दिलं आहे, त्यावर दोन दिवसात बैठक होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. असं मत त्यांनी या लाइव्हमध्ये मांडलं. सोबतच सीईटीच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत होतील, हा मुद्दादेखील प्रामुख्याने त्यांनी या लाइव्हमध्ये मांडला आहे. सोबतच त्या परीक्षा कधी होतील याची तारिखदेखील त्यांना आज सांगितली.
जुलै महिन्याच्या 4, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30, 31 या तारखांना राज्यात अनेक क्षेत्रातील सीईटी परिक्षा होतील. या तारखांना जरी विद्यार्थ्यांना हजर राहाता आलं नाही तर अशांसाठी ऑगस्ट महिन्याच्या 3, 4, 5 तारखांना परत परीक्षा घेणार, हा मुद्दा शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केला. या सीईटी परीक्षा देण्यासाठी राज्यातल्या 4 लाख 13 हजार 213 विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे आणि अधीकची नोंदणी झालेले विद्यार्थी मिळून 5 लाख 24 हजार 907 विद्यार्थी सीईटी परीक्षा देण्यासाठी सज्ज आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. त्यातच भर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाण्यास अडचण आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रवासाची सोयदेखील करण्यात आली आहे, असंदेखील उदय सामंत म्हणाले आहेत.
मागच्या आणि आजच्या लाइव्हमधल्या तफावतीमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण या लाइव्हमध्ये उदय सामंत यांनी कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय सांगितला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, विद्यार्थ्यांचे पालक, अनेक अभ्यासक शिक्षण मंत्र्यांच्या या मुद्दावर नाराज आहेत.
यूजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शन सुचनेमध्ये कुठेही नमूद नाही की अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजे, याउलट यूजीसीने परीक्षांबाबतचे सगळे अधिकार विद्यापीठांना दिले आहेत, जर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळता येत नसेल, तर मार्गदर्शक सूचनेतील परिच्छेद क्रमांक. 5 प्रमाणे विद्यार्थ्यांना सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत. मग श्री. उदय सामंत यांनी हे पत्र यूजीसीला कशासाठी पाठविले, याची कल्पना करता येत नाही. शिक्षण हे राज्याच्या अखत्यारीत येते मग राज्याने यावर स्वतः निर्णय घेतला पाहिजे. असे मत महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी मांडले आहे.
त्यामुळे सीईटी सोडल्यास बाकी कुठल्याच परीक्षा राज्यात लॉकडाऊनमुळे, कोरोना व्हायरसच्या संक्रमनामुळे होतील, यावर शंका आहे. येत्या दोन दिवसात खुद्द शिक्षणमंत्री उदय सामंत किंवा युजीसी बोर्डाकडून याबद्दलचा खुलासा केला जाईल, सध्यातरी विदयार्थ्यांनी घरी राहावे आणि सुरक्षित राहावे. परीक्षाबद्दलच्या सगळ्या अपडेट तुम्हाला वंटास मुंबई व्यवस्थितरित्या देत राहिल.


0 Comments