बदल! हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा बनवला तो म्हणजे कोरोना व्हायरसने. सामान्य आणि सुरळीत चाललेले आपले जनजीवन कोरोनाने संपूर्ण बदलून टाकले आहे, मग क्षेत्र कोणतेही असो. आपण आज शिक्षण क्षेत्रात कोरोना व्हायरसमुळे अनेक बदल झालेले पाहात आहोत.
नुकतेच आपल्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी "15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे" अशी माहिती दिली. आता कोरोना परिस्थितीत शाळा सुरू करणे धोक्याचे आहे का? शाळा सुरू झाल्या तर त्यामध्ये काय बदल असतील? कोरोनापासून बचावासाठी काय उपाययोजना असू शकतात, या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे वंटास मुंबईच्या या खास रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
15 जूनपासून शाळा सुरू?
15 जून ही नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. आजची परिस्थिती पाहाता, शाळा सुरू होतील का याबाबत अनेकांमध्ये गोंधळ सुरू होता. आज अखेर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अनेकांच्या गोंधळावर "15 जूनपासून शाळा सुरू होणार" असा शिक्कामोर्तब केला आहे. एकूणच कोरोना रुग्णांचा आढावा घेता, राज्यात वाढत्य़ा रुग्णसंख्येमुळे सतत लॉकडाऊनच्या कालावधी वाढवला जातोय.
यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शाळा सुरु करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शाळा महाविद्यालातील परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही लॉकडाऊन उठवण्यासंबंधी कोणतीच निश्चितता नसल्याने विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे, असेही त्या एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.
काय असतील शाळेचे नवीन नियम व योजना
◆ कोरोना संकटात महत्वाचे आहे ते सोशल डिस्टनसिंग! शाळा सुरू केल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांना सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.
◆ मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, विद्यार्थी संख्येचा. ही समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वर्ग चालवणं हा पर्याय निवडण्यात आला आहे.
◆ विद्यार्थ्यांना सम व विषम हजेरी क्रमांकानुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्याचा विचार करण्यात येत आहे.
◆ शाळेत विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने शाळेचे तास कमी करण्याचा विचार करण्यात येतील.
◆ गृहपाठ तसेच ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणावर भर देण्यात येईल.
◆ तसेच सकाळवेळ असणाऱ्या शाळेत होणाऱ्या प्रोग्रामवर बंदी घालण्यात येईल.
◆ एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी असणार.
◆ प्रत्येक पर्यायी दिवशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला फोनद्वारे संपर्क करून सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या जातील.
◆ हाथ धुणे, सॅनिटायझर तसेच मास्कचा वापर करणे ह्याबाबत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये वारंवार जनजागृती करण्यात येईल.
◆ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल तर, शाळा सुरू करणे हाच उत्तम पर्याय आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीत आता तो कितपत सार्थ पर्याय ठरतो, हे पाहणे आव्हानात्मक ठरेल.
कोणत्या झोनमध्ये सुरू होतील शाळा
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या जबाबानुसार, कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणे हे मोठे आव्हान देणारे काम आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात फक्त ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शाळा सुरू केल्या जातील. रेड झोनमध्ये शाळा सुरू करणे हा निर्णय विद्यार्थ्यासाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे रेड झोनमध्ये असलेल्या शाळांमध्ये याचा विचार होऊ शकत नाही. तसेच शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेपूर्वी काही गोष्टी सुधारण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईत होऊ शकतात शाळा सुरू?
15 जूनला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरु केल्या जातील, असे स्पष्ट संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. मुंबईचा विचार केला तर, कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही मुंबई ही रेड झोनमध्ये मोडली जाते. त्यामुळे मुंबईमध्ये 15 जूनला शाळा सुरू होण्याची कोणतीही स्पष्ट चाहूल अद्यापही दिसत नाही.


1 Comments
छोट्या मुलांच्या शाळा सुरू होत आहेत पण त्याबरोबर काही शाळांनी आपली फी वाढवलेली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती विस्कटलेली आहे आणि जर अशात शाळांनी आपली फी वाढवली तर हे कितपत योग्य आहे. त्यातच शासनाने कोणत्याच प्रकारे फी वाढणार नाही असे सर्व शाळांना ठणकाऊन सांगीतले तरी काही शाळांनी शासनाच्या ह्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून हे दाखवून दिले की ते कोणालाच जुमानत नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करावं? एकीकडे सरकारी शाळांची परिस्थिती इतकी ढासळली आहे की कोणीही आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवणार नाही. स्वत: सरकारी शाळेतील शिक्षकच आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकवायला तयार नाही. ह्याचे कारण सरकारी शाळेतील शिक्षक हे आपले कर्तव्य योग्य रितीने पार पाडतांना दिसत नाही. त्यामुळेच तर सरकारी शाळा ह्या परिस्थितीला येऊन पोहचल्या. दिल्लीमध्ये श्री केजरीवाल सरकारने सरकारी शाळांची परिस्थिती सुधारून तेथील शाळांना आज ज्या उच्च स्थानी आणून ठेवले ते पाहता दिल्लीतील सर्व जनता आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकवायला तयार आहे. तशीच सुधारना महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये का होऊ शकत नाही. असे जर झाले तर प्रत्येकजण आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकवायला तयार होईल. कोणालाच प्रायव्हेट शाळेत शिकवण्याची गरज पडणार नाही. ही सुधारना करायला महाराष्ट्र सरकारने जास्त वेळ लावू नये आणि सध्याच्या परिस्थितीत ज्या शाळेंनी फी वाढवलेली आहे त्या शाळांना आदेश द्यावा कि ह्या वर्षीची फी पूर्णपणे माफ करण्यात यावी. माझी ही माहिती शासनापर्यंत पोहवण्याची कृपा करावी जेणेकरून प्रत्येक पालकांवरील शिक्षणाच्या फी चा बोज़ा कमी होईल. धन्यवाद..!
ReplyDelete