सध्या कोरोनाचं वातावरण आहे, त्यामुळे भारतातील जास्तीत जास्त लोकं लॉकडाऊन भोगत आहेत. जे काही लोक आपातकालीन सुविधेमध्ये येतात, ते कोरोनाशी दोन हात करत आहेत. भारतातील अनेक लोक लॉकडाऊनमुळे सक्तीची आणि कंटाळवाणी सुट्टी भोगत आहोत. त्यामुळे अनेकांना रविवार आणि सोमवार सारखाच झाला असेल.

आता जरी तुम्हाला नुसती सुट्टीच मिळत असली तरी, काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतात कामगारांना रविवारची सुट्टी मिळत असायची, हे विसरून चालणार नाही. या दिवशी सर्व लोक आपला वेळ कुटुंबासाठी देत असतात. रविवारी नवं-नवीन प्लॅनिंग करून सुट्टी पूर्ण एन्जॉय करत असतो. पण आपल्याला एवढ्या दिवसात केव्हा प्रश्न पडला का? की रविवारची सुट्टी आपल्याला कोणामुळे मिळते? नाही ना? 

संपूर्ण भारतीयांना रविवारची सुट्टी दुसऱ्या कोणामुळे मिळाली नाही, तर एका मराठी माणसांमुळे आपल्याला ही सुट्टी मिळाली. ते आहेत, नारायण मेघाजी लोखंडे. ते भारतीय कामगार चळवळीचे मुख्य नेते होते. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 साली मुंबईत बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनची स्थापना केली, जी भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. संघटना स्थापन केल्या-केल्या लोखंडे आणि संघटना, कामगारांचे अनेक प्रश्न सरकारसमोर मांडत होते व त्यासाठी आंदोलन करत होते. या वर्षीच लोखंडे आणि त्यांच्या संघटनेने सरकार समोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. 

काय होत्या मागण्या?
● कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी. 

● जेवणासाठी किमान अर्धा तास सुट्टी असावी. 

● कामाचे तास कमी करावेत.

● कामगारांना पगार वेळेवर मिळावा. किमान गेल्या महिन्याचा पगार या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत व्हावा. 

● अपघातात सापडलेल्या कामगारांना नुकसान भरपाई आणि रजेचा पगार मिळावा. 

● 24 एप्रिल रोजी नारायण लोखंडे आणि संघटनेची मोठी सभा महालक्ष्मी रेसकोर्स येथे झाली. लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मिल कामगार या मोर्च्यात सामील झाले. अखेर 10 जून 1890 रोजी तब्बल 6 वर्षांनी सार्वजनिक सुट्टीची रविवारची मागणी अखेर मान्य केली.

कोण होते नारायण मेघाजी लोखंडे…?
नारायण लोखंडेंचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कण्हेर. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण करून अगोदर रेल्वे मग पोस्ट आणि नंतर मुंबईच्या मांडवी भागात कापड गिरणीमध्ये स्टोअर किपर म्हणून नोकरी केली. तिथे कमी पगारात 13 ते 14 तास काम करून आठवड्याची सुट्टीही मिळत नव्हती. म्हणून ही नोकरी सोडून कामगार चळवळीची सुरुवात केली. लोखंडे हे महात्मा फुलेंनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. 1896 साली आलेल्या प्लेगने विळखा घातला आणि यामध्येच त्यांचे निधन झाले.