जेव्हापासून महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झालाय तेव्हापासून मुंबईतही कोरोना रुग्णांचा आलेख मोठ्याप्रमाणात वाढतोय. देशात सर्वाधिक रुग्ण असलेलं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे, मात्र इतिहासापासून आतापर्यंत देशाची आर्थिक राजधानी म्हणूनदेखील मुंबईची ओळख आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही; म्हणून मुंबईतले काही भाग हळू हळू सुरू होताना दिसत आहेत.
मुंबईचा मिनी इंडिया म्हणून इथल्या धारावीची ओळख आहे. तशी इथल्या लोकसंख्येमुळे आणि आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमुळे तिची खास ओळख आहे. सगळ्या तज्ज्ञांचा समज असा होता की एकदा का धारावीत कोरोनाने एन्ट्री केली की मुंबईत हाहाकार माजेल, पण तस होताना आपल्याला दिसत नाही.
सुरुवातीला धारावीत रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत गेले. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही एकाच पटीने वाढत होता. मात्र तोच आकडा वाढण्याच प्रमाण एका टप्प्याला येऊन संथ झालं. एकेकाळी दिवसाला 50-60 रुग्ण ज्या धारावीतून समोर येत होते त्याठिकाणी 15-20 या पटीने रुग्ण समोर येऊ लागले. गेल्या काही दिवसांपासून धारावीतला डबलिंग रेट (म्हणजे रुग्ण दुप्पट होण्याची क्षमता) 18 दिवसांवरून 80 दिवसांवर गेला आहे, तर मृत्युदरही तितकाच कमी झाला आहे
असं म्हटलं जातं की 2.5 स्क्वेअरफूट जागा असलेल्या धारावीत तब्बल 12 लाखांहुन अधिक लोक राहातात. अनेक लोक स्वतःचे छोटेमोठे व्यवसाय करतात, तर अनेक लोक इथल्या कारखान्यांमध्ये काम करत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे या अनेकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले आणि धारावीतले तब्बल दीड लाखांहून अधिक लोक आपल्या गावी परतले. सध्या जितके लोक धारावीत आहेत, त्यांचं त्यांच्या गावी कोणतीच संपत्ती नाही, कोणाला गावचं नाही, तर कोणाला वाटतं की धारावी लवकर सुरू होईल. जसजशी मुंबई सुरू झाली तसतशी धारवीही इव्हन आणि ऑड फॉर्म्युलानुसार सुरू झाली. इथले अनेक लोक बिनधास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. यातील 80 टक्के सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात, जो धारावीत कोरोना पसरवण्याचा केंद्रबिंदू होता.
प्रशासन जागं केव्हा झालं?
धारावीत जर कोरोनाने एन्ट्री केली तरी तो कोणालाच आवरता येणार नाही, हे इथल्या प्रशासनालाही माहीत होतं. 1 एप्रिल रोजी धारावीत कोरोनाचा पहिला मृत्यू समोर आला आणि पालिका प्रशासन कामाला सज्ज झाली. धारावीतला कोरोना संक्रमणाचा केंद्रबिंदू असलेल्या शौचालयांवर औषध फवारणी करणे हे पालिकेने पहिलं काम सुरू केलं. डोअर टू डोअर जाऊन तपासणी करणे, फिवर चेकिंग करणे, खाजगी डॉक्टरांची मदत घेणे, कंटेंनमेंट झोनची संख्या वाढवणे, तिथल्या लोकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे, ज्या परिसरात रुग्ण आढळेल त्याला सील करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तिथल्या संपर्कात आलेल्या लोकांना दुसर्या जागी शिफ्ट करणे अशी कामे पहिल्या पातळीवर सुरू झाली.
धारावीच्या आमदार सांगतात...
धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड म्हणतात की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा महत्वाचा पैलू आम्हाला मदतीला आला. इथल्या अनेक स्वच्छता गृहांना वेळोवेळी निर्जंतुकिकरण करणे, हे आमचं काम सुरूच होतं, खाजगी डॉक्टरांनी आम्हाला वेळीच मदत केली, तर फिव्हर कॅम्पमुळे आम्ही धारावीत आतपर्यंत आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो.धारावीत लोकांनीही डॉक्टरांना इतकीच मदत केली, अस वर्षा गायकवाड सांगतात.
धारावीतले सहाय्यक आयुक्त म्हणतात...
धारावीतले सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी इंसाईड धारावी या शोशी बोलताना सांगतात की धारावीत सुरुवातीला रुग्णांची संख्या वाढली हे खरं आहे, त्यासाठी आम्ही साधारण 7 ते 8 लोकांचं स्क्रिनिंग केलं. संशयित वाटणाऱ्यांच्या लगेचच टेस्टिंग केल्या, ज्यांना गरज आहे अशा 9 हजार जणांना आयसोलेट केलं. जिथं कोरोनाचा रुग्ण आढळेल तिथला शक्य असल्यास परिसर सील केला नाहीतर तिथल्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केलं. आम्ही जितकं कोरोना रुग्णांशोधण्यासाठी धावायचो, तितकंच कोरोना पसरू नये म्हणून धावायचो, त्यामूळे सध्यातरी धारावीतली परिस्थिती ठीक आहे, अस किरण दिघावकर सांगतात.
धारावी कोरोनामुक्त झाली का?
या प्रश्नांच उत्तर सध्यातरी 'नाहीच'. मात्र अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जी भीती धारावीबद्दल आणि एकुण मुंबईतील रुग्णसंख्येबद्दल वर्तवली होती तशी परिस्थिती अद्यापतरी निर्माण झाली नाही. मात्र हळू हळू संपूर्ण मुंबई सुरू होत आहे, त्यासोबतच धारावीदेखील सुरू होत आहे, त्यामुळे क्लोज कॉन्टॅक्ट वाढणे, त्यासोबतच संक्रमण वाढणे, असे प्रकार नक्की होऊ शकतात, त्यामुळे धारावीसह मुंबईतल्या नागरिकांना आपल्या तब्येतीची काळजी स्वतःलाच सोशल डिस्टन्सिंग घेऊन घ्यावी लागेल. हा लेख कसा वाटला हे कमेंटमधून जरूर कळवा आणि अशा वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा.


0 Comments