मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नेमका हा आकडा कसा वाढत आहे, याबद्दल शंका प्रस्थापित केली असता, गडद लोकसंख्या असलेल्या मुंबईत दाटीवाटीच्या लोकवस्तीत ‘क्लोज काँटॅक्ट’मुळेच रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे समोर आले. नेमक काय आहे यामागचं कारण आणि कसे वाढतात रुग्ण, पाहुयात वंटास मुंबईच्या या खास रिपोर्टमधून...

क्लोज काँटॅक्टमुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळच्या संपर्कात आल्यामुळे स्पर्शामार्फत असो वा हवेमार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आणि मुळात त्यामुळे मुंबईतील रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता महानगरपालिके मार्फत पॉझिटिव्ह रुग्णासोबत त्याच्या ‘क्लोज काँटॅक्ट’चा शोध घेऊन मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत, जेणेकरून संसर्ग कमी होऊन धोका टाळता येईल आणि कोरोना रुग्णांचा वाढता आकडा नियंत्रणात आणता येईल.

आता मुद्दा येतो सोशल डिस्टनसिंगचा; बहुदा दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळणे 'ना'च्या बरोबर असते. त्यामुळे अशा ठिकाणी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अनेकांसाठी धोकादायक ठरू शकतो. मुंबईतील बेस्ट उदाहरण सांगायचं झालं तर धारावी...

क्लोज कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे 1 लाख 30 हजारांची तपासणी
◆ मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आठ हजारांवर गेली असली तरी क्लोज कॉन्टॅक्टचा विचार करून पालिकेच्या माध्यमातून 30 एप्रिलपर्यंत 1 लाख 30 हजार जणांचे काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले.

◆ 1 लाख 30 हजार मधील 7 हजार 500 नागरिकांना संशयित रुग्ण म्हणून पालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये निगराणी खाली ठेवण्यात आलं आहे, तर 3 हजार 400 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

◆ 1 लाख 30 हजार मधील तब्बल 6 हजारांहून अधीक रुग्णांना इतर आजार असल्याने त्यांना कोरोनापासून दूर ठेवणे पालिकेसमोर मोठं आव्हान बनत चाललं आहे. 

काय सांगते मुंबई महापालिका
कोरोना रुग्ण सापडल्यनंतर त्याची पूर्ण चौकशी करून आम्ही क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असलेल्यांच्या चाचण्या ताबडतोब सुरू करतो, जेणेकरून धोका वाढू नये असे महानगर पालिका सांगते. मुंबईत 3 मेपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये समूह संसर्गाचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. मात्र पालिकेने मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, फक्त सोशल डिस्टनसिंग पाळत काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. तसेच मुंबईकरांनी कोणत्याही अफवांचा बळी जाऊ नये आणि घाबरू नये, असे सांगतानाच समूह संसर्ग होऊ नये यासाठी काळजी मात्र घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईतील वाढत्या आकडेवारीबद्दल अहवाल काय सांगतो...
मुंबईत हाय रिस्क आणि लोवर रिस्क काँटॅक्ट ट्रेसिंग आणि चाचण्यांचे प्रमाणही वाढल्यामुळे जास्त रुग्ण आढळत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. एप्रिल अखेर मुंबईतील रुग्णांची संख्या 46 हजारांवर जाणार असल्याच्या बातम्या केंद्रीय समितीच्या अहवालाच्या आधारे दाखवल्या जात होत्या. मात्र या बातम्यांनुसार आकडा वाढला नाही आणि केंद्रीय समितीनेही अशी कोणत्याही प्रकारची शक्यता वर्तवली नसल्याचे पालिकेने जाहीर केले. रुग्ण वाढत असले तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सक्षम असल्याचेही पालिकेने म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मॅसेज काय सांगतो...
आपण सामुदायिक संसर्गाच्या उंबरठ्यावर आहोत. 3 ते 18 मे हा काळ सर्वात वाईट असून पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने पुढे येतील. त्यामुळे या काळात आपण सावधगिरी बाळगावी. वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये. कारण या काळात आपण कोरोना व्हायरसच्या सर्वात टॉपच्या बाजूवर असू. सर्व संक्रमण या दोन आठवड्यात दिसून येईल. पुढील दोन आठवडे शांत राहतील तर पुढील दोन आठवडे ते कमी होईल. या काळात आपण संयम बाळगावा. कारण इटलीमध्ये या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वात जास्त प्रकरणे बाहेर आली. त्यामुळे 3 ते 18 मे या कालावधीत कोणाला भेटू नका. अगदी जवळच्या कुटुंबीयांनादेखील भेटू नका. कारण या काळात आपण संक्रमणाच्या कमाल टप्प्यावर असू!


   हेही वाचाच...