येत्या 18 तारखेपासून लॉकडाऊन वाढतोय, हे अखेर निश्चित झालं आहे, सोबतच लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3 यांच्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची आकडेवारी वाढतच चालली आहे, त्यामुळे हा लॉकडाऊन अजून किती दिवस वाढेल याबद्दल कोणतीही ठाम माहिती मिळत नाहीये. त्यामुळे सगळेजण आपआपल्या गावी जाण्यास निघाले आहेत.

अनेकांना वाटलं होतं की राज्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरू होतील (तशाप्रकारचा आदेश निघालाही होता), मात्र काही अटींमुळे आणि समस्यांमुळे राज्याअंतर्गत होणारं स्थलांतर थांबवण्यात आलं, परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्याप्रकारचा खुलासा केला आहे. पण तरीही अनेकजण मुंबईतून स्वत:च्या खर्चाने आपल्या गावी जाताना दिसत आहेत, त्याच्यात काहींना पोलिसांकडून परवाणगी मिळत आहे, तर काहींना नाही, त्यामुळे अनेकजण संभ्रमात आहे, त्याबद्दल आपण काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

मुंबईतून अनेक बस गाड्या सुरू होणार होत्या, त्याप्रकारचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनदेखील काहींनी केलं होतं, मात्र रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचा आकडा वाढत गेला आणि प्रशासनाला आपला निर्णय बदलावा लागला. आपल्या निर्णयांमध्ये बदल करून राज्यात असलेले परप्रांतिय आणि परप्रांतात असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना फक्त बस सेवा पुरवायची असा नवा आदेश लागू करण्यात आला, तशाप्रकारची अंमलबजावणीदेखील सुरू आहे.

दिनांक 15 मेपर्यंत...
  • महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतियांना त्यांच्या राज्यांच्या सिमेपर्यंत सोडण्यासाठी 10 हजार 006 बसेस सोडण्यात आल्या 
  • आतापर्यंत राज्यातून 1 लाख 34 हजार 538  कामगारांना बसच्या माध्यमातून त्यांच्या राज्यांच्या सिमेपर्यंत पाठवण्यात आलय
  • श्रमीक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून रोज 9 ते 10 हजार परप्रांतिय राज्यातून बाहेर पाठवले जात आहेत

काय आहेत नियम
राज्य प्रशासनाने रेड, ऑरेंज आणि ग्रिन अशी कोरोना संक्रमणाची विभागणी केली आहे. नियम असे सांगतात की राज्यातल्या ग्रीन आणि ऑरेंज भागातून वाहतूक, स्थलांतर होऊ शकतं. मात्र यात रेड झोन अपवाद आहे, म्हणजे ज्या भागांना रेड झोन म्हणून घोषित केले आहे त्या भागातून कोणीच बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरून कोणीही त्या रेड झोनमध्ये जाऊ शकत नाही. मुंबईत देखील असे काही भाग आहेत, जिथून ना कोणाला बाहेर जाता येते ना तिथे कोणाला जाता येते. 

याच अधारे आपण मुंबईतले असे भाग पाहाणार आहोत, जे काही दिवसांपासून रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ज्यातून बाहेर म्हणजे आपल्या गावी जाण्यासाठी तिथले पोलीस परवाणगी देत नाहीत. 

मुंबईतले रेड झोन...

इ वार्ड - भायखळा, कामाठीपुरा, रे रोड, वेस्ट साने गुरुजी मार्ग, सुखलाजी स्ट्रीट, दत्ताराम लाड रोड, साऊथ रामचंद्र भट्ट रोड, वाडी बंदर आणि मौलाना शौकताई रोड या भागाला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

एफ/एन वार्ड - माटुंगा, ठाण्यातील काही भाग आणि मनकिकर मार्ग 

जी/एन वार्ड - दादर, माहिम, माहिम वेस्ट, माटुंगा रोड, धारावी आणि यांच्या आजूबाजूचा परिसर

जी/एस वार्ड - वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, धोबी घाट, सातरस्ता, लोअर परेल, करी रोड, जिजामाता नगर 

के/डब्ल्यू वार्ड - जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम, सांताक्रृझ पश्चिम

अखेर हे भाग मुंबई शहरात रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत, त्यामुळे या भागातील कोणीही गावी अथवा कोणत्याही प्रकारचा प्रवास करू शकणार नाहीत, सोबतच या भागात कोणीही नव्याने राहाण्यास येऊ शकत नाही. अशी माहिती इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये या भागांव्यतिरिक्त जर तुम्ही दुसरीकडे राहात असाल आणि तुम्हाला तात्काळ प्रवास करणे गरजेचे आहे, तर तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन अथवा ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून नाव नोंदणी करून जाऊ शकता.