1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. याबाबतचा इतिहास वंटास मुंबईने वाचकांसमोर ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य हे गुजरात पासून वेगळं करणे असो; वा मुंबई सारख्या शहराला महाराष्ट्रात स्थान प्राप्त करून देने असो, या दोन्ही महत्वाच्या घडलेल्या गोष्टींमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोलाचा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे गेल्या कित्येक दशकांपासून अनेक लोक महाराष्ट्रासाठी तसेच अनेक हक्कांसाठी लढत असणारा एक संघ. जेव्हा आपला महाराष्ट्र वेगळा नव्हता तेव्हापासूनचा महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व मिळवून देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळी वेळोवेळी झगडत होती. आज 1 मे या दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास जाणून घेणे गरजेचे असल्यामुळे वंटास मुंबई खास वाचकांसाठी हा संपूर्ण लेख लिहण्याचा थाट मांडत आहोत.
संयुक्त महाराष्ट्र; ऐतिहासिक पार्श्वभूमी
1 मे 1960 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली. अशा प्रकारे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचे तमाम मराठी जनतेचे स्वप्न अखेरीस साकार झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि मराठी जनतेच्या न्याय-हक्क मागणीला एकमुखी सामुदायिक नेतृत्व प्राप्त करून देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई प्रांत, मध्य प्रांत, वऱ्हाड आणि हैद्राबाद या संस्थानात विभागला गेलेला मराठी भाषिक प्रांत एकत्र आणून एकसंध महाराष्ट्राची निर्मिती करावी असा विचार संयुक्त महाराष्ट्राद्वारे मांडण्यात आला; थोडक्यात सर्व मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणून त्या प्रदेशाचे महाराष्ट्र हे वेगळे राज्य निर्माण करावे, यासाठी मराठी भाषिकांनी जी मागणी केली, त्याला पाठबळ हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे होते. 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याआधीपासूनची ही चळवळ अस्तित्वात होती.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील विठ्ठल ताम्हणकर, ज्ञानकोषकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजय गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, गं. त्र्य. माडखोलकर, ग. वि. पटवर्धन, शं. रा. शेंडे अशा अनेकांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची स्वप्ने 1910 पासून पाहिली होती. याच एकीकरणाचे विचार अनेक साहित्य संमेलनातुन मांडले जाऊ लागले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीची उद्दिष्टे
◆ भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार भारतीय संघराज्याचे घटक असे संयुक्त महाराष्ट्राचे मराठी भाषिकांचे एकात्म व सलग राज्य प्रस्थापित करणे.◆ लोकसत्ताक व समाजवादी महाराष्ट्र प्रस्थापित करणे आणि समितीने पुरस्कार केलेला कार्यक्रम पूर्ण करणे.◆ महाराष्ट्रातील आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाची सहकारी तत्त्वावर उभारणी करणे.
हेही वाचाच...

0 Comments