भारतात लॉकडाऊन सुरू होऊन 40 दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊन गेलेत, देशात कोरोनाचा पादुर्भाव कमी व्हावा म्हणून केंद्र सरकार त्यांचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. जगभरात कोरोनाचा थैमान सुरू असताना त्याच्या तुलनेत भारतात रुग्णांची संख्या कमी आहे. याचं श्रेय त्या-त्या राज्यातील राज्य सरकारांना आहे, त्याच प्रकारे देशातील इतर यंत्रणांनादेखील श्रेय दिले पाहिजे.

कोरोनावर जर मात करायची असेल तर अशीच लढायची तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर 3 एप्रिल रोजी आरोग्य सेतू अॅपची घोषणा केली. तुम्हाला कोरोना व्हायरसची माहिती हवी असेल, तुम्ही कोरोना रुग्णांच्या संपर्कात आहात का? त्या संदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून दिल्या जातील, असा या अॅपचा उद्देश होता.

आरोग्य सेतू अॅप हे अँड्रॉइड आणि अॅपल या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊ शकते. हे अॅप आतापर्यंत 5 कोटीपेक्षा जास्त जणांनी डाउनलोड केलं आहे.

आरोग्य सेतू काम कसं करत?
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्यावर, त्यात आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग या नंबरला एक ओटीपी येईल, तो इन्सर्ट केल्यावर, आपली वैयक्तिक माहिती तिथे विचारली जाते, ती भरली की आपण सरकारशी जोडले जातो. तुम्ही आताच्या काळात परदेशी प्रवास केलाय की नाही, हेदेखील त्यात विचारलं जातं.

याच्या पुढे जाऊन तुमच्या आरोग्याबद्दल माहिती तिथे भरावी लागते. ही माहिती खरी असावी. ही माहिती खरी की खोटी याबद्दलची खातरजमा होत नाही. सध्या जी माहिती दिली जाते, ती क्रॉस चेक करण्यासाठी या अॅपमध्ये कोणतीही सुविधा नाही.

आरोग्य सेतूची गरज...
जर हे अॅप वापरत असताना ब्लुटूथ आणि लोकेशनदेखील सुरू ठेवत असाल, तर याचा अधिक फायदे तुम्हाला होऊ शकतो. तुमच्याकडे हे अॅप असेल आणि तुम्ही कोरोना व्हायरस असलेल्या व्यक्तीचा संपर्कात आलात तर तुम्हाला हे अॅप सतर्क करतं. लोकेशन ट्रेसिंगमुळे हे देखील समजलं जात की तुम्ही त्या व्यक्तीच्या किती वेळ संपर्कात आहात. पण हे सर्व तेव्हाच शक्य असतं जेव्हा त्या अॅपमध्ये तुमची माहिती खरी भरली जाते.

हे अॅप 11 भाषेमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे भारतात सर्वत्र वापरलं जाऊ शकतं, असा अंदाज आहे. पण या अॅपच्या माध्यमातून  व्ययक्तिक गोपनीयता व सुरक्षितता याबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे अॅप माहिती गोळा करतय आणि वापरकर्त्यांवर सरकार 24 तास लक्ष ठेवू शकतात. ती व्यक्ती कुठे जातेय, कोणत्या मार्गाने जातेय, किती वेळ थांबतेय, याबद्दलची सर्व माहिती सरकारला मिळत आहे, असा सवाल देखील अनेकांनी उभारला आहे. हे आरोग्य संकट टळल्यानंतर हा डेटा नष्ट केला जाणार की नाही, यासंदर्भात सरकारने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. 

आरोग्य सेतूच्या प्रायवसी पॉलिसीमध्ये काय लिहलय?
तूम्ही दिलेला डेटा हा फक्त कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी वापरला जाईल असं म्हटलं आहे.
हे अॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर 30 दिवसात तुमची माहिती डिलीट केली जाईल.

आरोग्य सेतू अॅपमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल का?
जे लोक हा अॅप इन्स्टॉल करतील, त्यांचीच माहिती सरकारपर्यंत पोहोचेल. भारतात 1.3 अब्ज लोकसंख्या आहे, त्यापैकी फक्त 5 कोटी लोकांनी हे अॅप इन्स्टॉल केले आहे. भारतात इंटरनेट अगदी कासवाच्या गतीने वाढत आहे. भारतात अनेक खेडी ही नेटवर्क विना आहेत, अशा ठिकाणी हे अॅप वापरण्यावर शंका आहे. येथे कोरोनाचे रुग्ण असले तरी हे अॅप काहीही काम करणार नाही, हे निश्चित. ज्यांच्याकडे हे अॅप नाही, त्यांच्यात कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांची माहिती कशी गोळा करायची हे मोठं आव्हान सरकारी यंत्रणेसमोर असणार आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारतात अनेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पण या तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा आहे, तसा तोटाही होऊ शकतो यामुळे धोकेही उदभवू शकतात. वाढते तंत्रज्ञान यामूळे मानवाला काही धोका होऊ नये यासाठी सतर्क राहाणे याकाळात गरजेचे आहे.

हा लेख तु्म्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा, तुम्हाला मुंबईविषयी अजून काही माहिती हवी असेल, तर तोही विषय सांगा, आम्ही त्या विषयाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू.

हेही नक्की वाचाच...