गेले कितीतरी दिवस तुम्ही घरातून बाहेर नाही. घरातून बाहेर पडलात तर दुश्मन तुमची वाट बघत बाहेर उभाच आहे. त्यामुळे तुमच्या मनात भिती निर्माण झालेय आणि नाविलाजास्तव तुम्ही घरी बसून आहात. असाच काहीसा प्रकार आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडला होता.

पन्हाळा गड म्हणजे कोल्हापूरच्या रागंड्या मातीत वसलेला 1200 वर्षांपुर्वीचा इतिहास सांगणारा सर्वात जुना किल्ला. त्याकडे पाहिलं की अजूनदेखील इतिहासाच्या घटना डोळ्यासमोर खेळल्या जातात. 28 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता, मात्र 2 मार्च 1660 मध्ये सिध्दी जौहरने महाराजांना संकटात आणण्यासाठी किल्ल्याला वेढा दिला. 

महाराज तब्बल 132 दिवस या किल्ल्यावर कोणतीही हालचाल न करता थांबले होते. मात्र अखेर किल्ल्याच्या गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने आपल्या 600 मावळ्यांसकट 13 जुलै 1660 रोजी पन्हाळ्यावरून बाहेर पडले. त्यावेळी नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यासाठी आपला जीव पणाला लावला आणि पावणखींड लढवली.

किल्ल्याला वेढा असताना काय केलं महाराजांनी? [काय केलं या लॉकडाऊनमध्ये?]

2 मार्च ते 13 जुलै 1660 असा तो काळ होता. पन्हाळगड भक्कम असल्याने सिद्धीच्या सैनिकांनी डागलेल्या तोफा पन्हाळगडाचं काहीच वाकडं करू शकत नव्हत्या, मात्र गडावरून सिध्दीच्या सैन्यावर डागल्या गेलेल्या तोफांमुळे त्याचे 600 हून अधीक सैन्य जखमी झाले, तर यात काहींचा मृत्यूदेखील झाल्याची माहिती आहे. या काळात मोगल आणि आदिलशाह अशा दोघांसमोबत महाराजांची लढाई सुरू होती. त्यातच बाहेरून अनेक मराठा सरदार महाराजांना किल्ल्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र त्यांना अपयश येत होते.

यादरम्यान महाराजांनी स्वराज्याचे सगळे धागेदोरे हाती घेण्याचा प्रयत्नदेखील अनेकवेळा केला. तर दुसरीकडे वेढा घालून बसलेल्या सिध्दीसोबत तह करण्याचे संकेतदेखील महाराज काहीदा देत होते, महारांजानी काही गुप्तहेरांच्या माध्यमातून आपली सुटका करून घेतली मात्र सिध्दी जौहरने महाराजांनी पळून जाण्यात मदत केली, असा संशय आदिलशहाला आला होता. त्यामुळे सिध्दीची चौकशीही त्याकाळी करण्यात आली होती. प्रामाणिक काम करूनदेखील आपल्यावर संशय घेतला जातोय, हे समजल्यावर सिध्दीनेच आदिलशहा विरोधात बंड केले.

वेढ्यात असताना समोर आलेल्या संकटाशी सामना करण्याचे आणि भविष्यातील अनेक चढायांचे नियोजन करण्यासाठी महाराजांनी तो वेळ वापरला आणि तिथून बाहेर पडतात 132 दिवस केलेल्या नियोजनाच्या आधारावर महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या.

त्यामुळे मित्रांनो आता तुमच्याकडे खूप वेळ आहे, अनेक मोहिमांचे नियोजन आता तुम्ही करू शकता, मिळालेला वेळ कोणत्याहीप्रकारे वाया घालू नका, घरीच राहा आणि भविष्यातल्या अनेक गोष्टींचं नियोजन करा, कारण मोठी झेप घेण्यासाठी वाघ एक पाऊल मागे जातो, मात्र आता तुम्ही खूप पावले मागे जात आहात, तुम्हाला त्याहूनही खूप मोठी झेप घ्यायची आहे, फक्त इतकच लक्षात असू द्या.