"हर इश्क का एक वक्त होता है
वो हमारा वक्त नहीं था;
पर इसका ये मतलब नहीं कि वो इश्क नहीं था"

अशा अनेक डायलॉगमध्ये अर्थपूर्ण भाष्य करणारा अभिनेता म्हणजे ऋषी कपूर...

गेली कित्येक वर्षे चॉकलेट बॉय म्हणून रसिक मनांवर अधिराज्य गाजवणारा आज बॉलीवूडचा एक कलाकार हरपला. इरफान खान यांच्या जाण्याला अवघे 24 तासही झाले नसताना आज रंगभूमीला पुन्हा एका कलाकाराने अलविदा केले.

ऋषि कपूर; एक नैसर्गिक कलाकार
4 सप्टेंबर 1952 चा ऋषी कपूर यांचा जन्म. त्यांनी बालवयात देखील छोटे कलाकार म्हणून काम केले. बॉबी, द बॉडी, प्रेम रोग, १०२ नॉट आऊट, मुल्क यासह शेकडो चित्रपट होते, ज्यात ऋषी कपूर यांनी शानदार काम केले. आपल्या प्रत्येक चाहत्याला ऋषी कपूरच्या अभिनयाने वेड लावलं, मग तो रोल रोमँटिक असो किंवा ऍक्शन चित्रपट असो. 2018 मध्ये या कलाकाराला कॅन्सरसारख्या आजाराने वेढले. 

गेल्या सप्टेंबर महिन्यात ते लंडनहुन नुकतेच उपचार घेऊन भारतात परतले होते. भारतात परतल्यावर त्यांनी "आता मला बरे वाटले आहे आणि मी आता कोणतेही काम करू शकतो. पुन्हा अभिनय कधी सुरू करायचा याबद्दल विचार करत आहे. लोकांना आता माझे काम आवडेल की नाही हे माहित नाही. परदेशी उपचारा दरम्यान मला बर्‍याचदा रक्त देण्यात आले. मग मी नीतूला सांगितले - मला आशा आहे की नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही." असं मत त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

सांगण्यात येत आहे की, गेल्या गुरुवारपासून त्यांची तब्बेत खालावली होती. काल अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील रीलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील आय सी यु वॉर्डमध्ये भरती करण्यात आले होते. आज सकाळी सुमार 8.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अखेरपर्यंत आमचे मनोरंजन करत होते, अशा भावना त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टर यांनी व्यक्त केल्या.

ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा
गेले अनेक दिवस कॅन्सरशी झुंज देत अखेर आज ऋषी कपूर यांनी शेवटचा श्वास घेतला. माणसाच्या सर्व इच्छा मरण्याआधी पूर्ण व्हायला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. बॉलीवूडच्या चॉकलेट बॉयची देखील एक इच्छा होती, मरण्याआधी माझी शेवटची इच्छा सांगताना ते म्हणतात; "माझ्या घरच्यांसोबत एक फॅमिली फोटो असेल आणि त्याच्या खाली लिहलेले असावे, सीन्स 1952"

रौफ लालासारखा व्हिलनचा रोल करून त्यांनी चाहत्यांना आणखी वेड लावले होते. खानदानी परंपरेनुसार त्यांच्या अंगात अभिनयाचे भूत सवार होते. अनेक सिनेमे करून त्यांनी आपली परदेशी देखील वेगळी प्रतिमा तयार केली होती. आज शेवटी वयाच्या 68 व्या वर्षी या अष्टपैलू अभिनेत्याने कलासृष्टीला राम राम ठोकला. अशा हरहुन्नरी चॉकलेट बॉयला वंटास मुंबईचा सलाम.
हेही वाचाच...