मुंबईमध्ये हॉस्पिटल क्वारंटाईन, होम क्वारंटाईन हे सगळं झाल्यानंतर आता काही दिवसातच आपल्याला हॉटेल क्वारंटाईन हा प्रकार पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही आणि काय नवीन भानगड?
तर मुंबईमध्ये कोरोना व्हयरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतेय. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाला खूप उपाय योजना कराव्या लागत आहेत, त्यातलीच एक योजना म्हणजे हॉटेल क्वारंटाईन.
मुंबईमध्ये अनेक अशी घरं आहेत, ज्यात चारहून अधीक लोक मुश्किलीने राहात असतात, त्यात क्वारंटाईन हा प्रकार कसा करायचा? म्हणून मुंबईतल्या लो रिस्क काँटॅक्ट्स आणि हाय रिस्क काँटॅक्ट्सचे विलगिकरण करायचं असेल, तर त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवावं लागेल. मुंबईतील सर्रास हॉस्पिटल्स आता या क्वारंटाईनमुळे भरलेली आहेत, त्यामुळे अशांना ठेवण्यासाठी 10 हजार हॉटेल्स, लॉजच्या रुम्सची निवड करण्यात आली आहे.
मुंबईत वरळी कोळीवाडा आणि जांभळीपाडा या दोन ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेक हाय रिस्क आणि लो रिस्क काँटॅक्ट्स असलेल्या नागरिकांना त्यांच्याच किंवा अजूबाजूच्या परिसरात असलेल्या हॉटेल्समध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतल्या 10000 हॉटेल्समधल्या रुम्स ताब्यात घेतल्या आहेत.
कोविड -19 पॉझिटिव्ह नसलेले मात्र त्यांच्या खूप जवळून संपर्कात आलेल्यांना हॉटेल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. ज्यात महानगर पालिकेच्या बजेटमध्ये येतील अशा पंचतारांकित हॉटेल आणि लॉजचा समावेश असणार आहे. तेथे अलगिकरणात ठेवलेल्या रुग्णांवर हॉटेलचे कर्मचारी घर पाळण्यासारखी देखरेख ठेवतील. त्यांच्या अनेक मूलभूत सुविधांची काळजी घेतील. संपर्कांशी (अलगिकरणात ठेवलेल्यांशी) संवाद साधताना सामाजिक अंतर (Social Distance) कसे ठेवायचे याविषयी पालिकेचे अधिकारी हॉटेल कर्मचार्यांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळपर्यंत 4141 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 1160 रहिवाशांना हॉटेलसह अनेक संस्थांमध्ये अलग ठेवण्यात आले आहे. मुंबईतले 300 पॉझिटिव्ह रुग्ण संसर्ग असताना 1,200 हून अधिक हाय रिस्क आणि 6,720 लो रिस्क लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतला जात आहे.

0 Comments