"यमदेव जरी न्यायला आला; तरी आपण अगदी थाटात उभं राहायचं" हा फिल्मी डायलॉग आपण खूप ठिकाणी ऐकला असेलच. असच काहीसं आपल्या जीवा भावाच्या मुंबईत रोज घडत असतं.

छोटे-मोठे दंगे, बॉम्बस्फोट, अतिवृष्टी, अग्नितांडव, अपघात अशा अनेक प्रकारच्या आपत्ती झेलत मुंबई अगदी थाटाने उभी आहे.

अगदी आमच्या जन्मापासून एक वाक्य नेहमी ऐकत आलेलो आहोत, ते म्हणजे मुंबई ही कोणासाठी थांबत नाही; पण याच एका रोगाने मात्र या मुंबईला पूर्णपणे एका जागेला थांबवून सोडलं. आपल्या बाजूच्या चीन या देशातील कोरोना व्हायरस मुंबईमध्ये दाखल झाला आणि ही परिस्थिती उद्भवली, मुंबईच्या 100 वर्षाच्या इतिहासात मुंबई शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेट वे ऑफ इंडिया येथे काल इतका शुकशुकाट पाहायला मिळाला आणि हेच संकेत मुंबई थांबण्याचे आहेत असं समजलं. एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर बंद होणारी मुंबई आज कोरोनामुळे बंद होण्याची नामुष्की ओढावली आहे. 


आपल्या देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र आढळले आहेत. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार दिनांक 22 मार्च 2020) जनता कर्फ्युचे आदेश दिले आहेत. त्यालाच साथ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे बस वगळता पुणे, पिंपरी, नागपूर, मुंबई यांच्यासह संपुर्ण महाराष्ट्राला लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. या बंदमुळे मुंबईसह देशाचे संभाव्य नुकसान होणार आहेच, सोबत देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्यामुळे याचा फटका शेयर बाजाराला देखील बसणार हे नक्की.

परंतु मुंबई बंद होण्याची ही पहिली वेळ नाही; याआधीही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मुंबईवर लॉकडाऊन होण्याची वेळ आलीच होती. त्याचाच आढावा आपण आता घेणार आहोत.

12 व 13 मार्च 1993 : हिंदु मुस्लिम दंगल 


अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली आणि मुंबईमध्ये जातीय दंगल उसळली. पोलिसांचे नियंत्रण सुटून मुंबई पूर्णपणे दंगलखोरांच्या ताब्यात गेली. त्यावेळेस लष्कराला पाचारण करून दंगल क्षमवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही दंगल शांत होते न होते तोच दोन महिन्यांनी मुंबईने 'ना भूतो ना भविष्य' असा स्फोट अनुभवला. 

मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर 12 मार्च 1993 च्या दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला स्फोट झाला. या स्फोटाचा दणका एवढा होता की 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी ठार झाला. स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला. कोणी आपली आई, कोणी बाबा, कुणी भाऊ तर कुणी बहिण या स्फोटात गमावली होती. काहींचे संपूर्ण संसार उद्धवस्त झाले आणि तेव्हापासून अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. 

11 जुलै 2006 : साखळी बॉम्बस्फोट


आताच्या घडीला रेल्वेतून दिवसाला सुमारे 70 लाख प्रवासी ये-जा करत असतात, मात्र 11 जुलै 2006 या दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटाने हादरली होती. पश्चिम रेल्वेच्या सात रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले होते. घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई; मिनीटाचा आणि एक रुपयाचा हिशोब ठेवणारी मुंबई या दिवशी अगदी स्तब्ध झाली होती. या हल्ल्यात 209 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला तर 714 जण जखमी झाले होते. लष्कर एकवारिया दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. 

26 जुलै 2005 : पावसाचा हाहाकार


26 जुलै 2005 रोजी मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. लाखो मुंबईकरांनी या दिवसाची धास्ती घेतली आहे. या दिवशी अवघ्या 24 तासात पडलेल्या 944 मिलिमीटर पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. या पावसाने शहर तीन दिवस बंद होतं. मुसळधार पावसामुळे अख्खी मुंबई जिथे होती, तिथे स्तब्ध होती. लोकांवर रस्ते, लोकल आणि वाहनांमध्ये राहाण्याची वेळ आली होती. पावसामुळे रेल्वेच्या 52 गाड्या, 37 रिक्षा, 7 हजार टॅक्सी, 900 बस 10 हजार टेम्पो व ट्रक बिघडले होते. तर मुंबईची विमान वाहतूक सेवा 30 तास बंद होती. या दिवशी चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर पाचशे कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

२६ नोव्हेंबर २००८ : दहशतवादी हल्ला


२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा देशातील सर्वात मोठा हल्ला होता. फक्त १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला छत्रपती शिवाजी टर्मिनस, लियोपोल्ड कॅफे, कुलाबा, ताज महाल हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, मादाम कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा, माझगांव डॉक, विले पार्ले या ठिकाणी घडवून आणला होता. 

२६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या चकमकीत ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते; पण तोपर्यंत मुंबईचे अतोनात नुकसान झाले होते.

17 नोव्हेंबर 2012 


हा दिवस अनेक मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ठरली. अख्ख्या मुंबईकरांनी ज्यांच्यावरून जीव ओवाळून टाकला, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच निधन झालं. पावसाळा आला, बॉम्बस्फोट झाले याच्याविरुद्ध मुंबईने संघर्ष केला, पण ही अशी घटना घडली होती, जिच्यावर दुःख व्यक्त करण्यापलीकडे कोणताच उपाय नव्हता.


या दिवशी संपूर्ण मुंबई स्वतःहून बंद झाली होती. लाखो मुंबईकर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात जमले होते.

या कारणांशिवाय देखील मुंबई कधी ना कधी अल्प स्वरूपात बंद झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईमध्ये पहिल्या पावसाचे पाणी साचून नागरिक घरी राहण्याचे हे नवीन नाही. 

नैसर्गिक आपत्ती, बॉम्बस्फोट व इतर गोष्टींसोबत दोन हात करताना मुंबई थांबली होती, अस म्हणता येईल; मात्र घड्याळाच्या काट्यावर धावणारी ही आपली वंटास मुंबई एका व्हायरसमुळे स्तब्ध झाली आहे, याची नोंद इतिहासालासुद्धा घ्यावी लागेल, हे नक्की.