जगभरासह भारतात देखील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीन येथून पसरलेल्या संसर्गजन्य रोगाने आतापर्यंत 8  हजारांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. भारतात देखील मृत्यूचा आकडा 3 वर आहे, यामुळे भारतातील लोक मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत. 

अशाच एका आजाराला 1896 साली भारत देश सामोरे गेला होता. त्यावेळी संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते. मुंबईचा विकास करण्यात इंग्रज उत्सुक होते आणि त्यांनी संपूर्ण मुंबईला गजबजलेले शहर बनवलं होत. मुंबईत विकास होऊ लागल्याने इतर पोट भरण्यासाठी, रोजगारासाठी अनेक लोक मुंबईत येऊ लागले. मुंबईची त्यावेळची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा अधिक होती. यामुळे मुंबई खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी बनण्यास सुरुवात झाली होती. सर्व मुंबईकर आपल्या कामात गुंग होऊन आपले जीवन जगत होते. यामध्येच माशी शिंकली आणि आघात झाला. या आघाताच्या जखमा अजूनही जिवंत आहेत. या जखमा अशा होत्या की मुंबईकरांसह अख्खा देश केव्हाही विसरणार नाही.

१८९६ हे साल मुंबईकरांसाठी यमदूत म्हणून आलं होतं, असच म्हणावं लागेल…

भारतात त्याकाळी उघडी गटारे होती. त्यामुळे या गटारांची सवय भारतासह मुंबईच्याही नागरिकांना झाली होती. परंतु इंग्रजांनी भुयारातून गटारे काढून सांडपाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. ही जमिनीखालून घातलेल्या पाईपची गटारे असल्याने रोगराई थांबवून मुंबईकरांचे आरोग्य सुधारेल असा त्याकाळच्या गव्हर्नरचा अंदाज होता. परंतु हा अंदाज चुकला आणि झालं उलटच. यामुळे संपूर्ण मुंबईला ज्या यातना झाल्या त्या शब्दात मांडणे अवघड…

मांडवी येथे अनेक मोठं मोठी धान्यांची गोदामे होती, जुलै महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाने मांडवी येथील धान्याची गोदामे भिजली. या गोदामात उंदरांचा वावरही मोठ्या प्रमाणात होता. गोदामात पाणी साचल्याने तिथे असलेले सर्व उंदीर मरून गेले. हे मेलेले उंदीर बंद असलेल्या गतारातून वाहू लागले आणि भुयारी संकल्पनेतून काढलेली गटारे पूर्णपणे चॉकप झाले. चॉकपमुळे एकाच जागेला साचलेले सर्व उंदीर कुजू लागले आणि त्यातून निर्माण झाला प्लेगसारखा महाभयंकर रोग.

एकतर प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. त्याच्यावर कोणताही उपाय नव्हता. शिवाय 19 व्या शतकात अनेक लोक अशिक्षित होते. लोकांच्या अडाणीपणामुळे हा रोग पसरण्यास जास्त धोका संभावू लागला. सुरवातीला मान्डवीमध्ये पसरलेला हा रोग थोड्याच काळात सगळ्या मुंबईभर पसरला. या रोगाच्या वेळी फक्त ताप आलाय म्हणून झोपलेल्या पेशंटच्या काखेत गाठ दिसू लागले. ही गाठ प्लेगची गाठ होती. औषध मोठ्या प्रमाणात होती; पण कोणतेही औषध या रोगावर नियंत्रण ठेवण्यास यशस्वी होत नव्हते. आठ ते दहा दिवसात  एका पेशंटचा मृत्यू ठरलेला होता. 

जागोजागी औषध फवारणी सुरु झाली. रस्ते साफ करण्यात येऊ लागले. घरातही जंतुनाशक फवारणी अनिवार्य केली. अनेक लोक मात्र त्या औषध फवारणी करणार्यांना घरात घुसू देत नव्हते. या औषधामुळे आमचा धर्म भ्रष्ट होत आहे, असा समज काही लोकांचा निर्माण झाला होता. भयंकर वेगाने प्लेग मुंबईत पसरू लागला. रोज शेकडो लोक मरु लागले. आताच्या काळात मुंबई सोडण्याचा जो निर्णय काहींनी घेतला आहे, असाच निर्णय अनेकांनी त्यावेळी घेतला होता. 

मात्र मुंबईतून हा रोग इतरत्र पसरू नये यासाठी बस, रेल्वे, जहाजे यांच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय ना चढू देत नव्हते ना तिथून कोणाला येऊ देत होते. गावं ओस पडली होती. जिथे घरात प्रवेश दिला जात नाही तिथे लष्करी बळाचा वापर करून औषध फवारणी केली जात होती.

तरीही हा प्लेग आटोक्यात येत नव्हता. अखेर मुंबईच्या गव्हर्नर संडहर्स्टने तार करून एका खास व्यक्तीला बोलवून घेतले. त्यांचे नाव, “डॉ. वाल्डेमेर हाफकिन”

तो मुळचा रशियन, जन्माने ज्यू. रशियामध्ये ज्यू लोकांवर  तिथल्या राजाने अत्याचार सुरु केल्यानंतर काही लोक पळून फ्रान्सला आले होते, त्यातलेच हे एक. हे पळून जाणे मुंबईच्या इतके उपयोगी पडेल याचा कोणीही विचार केला नव्हता. पॅरीसमध्ये जगप्रसिद्ध संशोधक लुई पाश्चर यांच्या हाताखाली मदतनिस म्हणून हाफकिन काम करू लागला. तिथे वेगवेगळ्या रोगावर उपाय शोधण्यासाठी प्रचंड प्रयोग सुरु होते. याच काळात लुई पाश्चर यांनी देवी या रोगावर लसीकरणाचा क्रांतिकारी शोध लावला होता.  

पुढच्या अनेक पिढ्यांवर उपचार करणारा पाश्चर लुई यांचा हाफकीन हा शिष्य. हाफकीनने कलकत्त्यातील कोलराच्या साथीवर मेहनत करून ही साथ आटोक्यात आणली होती, तोवर त्याहून महाभयंकर संकट हे मुंबईत अवतरले होते. एकही गोरा ब्रिटीश तिथे थांबायला तयार नव्हता आणि अशात हा हाफकिन स्वतःहून मुंबईत ७ ऑक्टोबर १८९६ रोजी आला. 

मुंबईच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी प्रचंड रांग लागली होती. प्रत्येक क्षण हा संकटाचा आणि आणिबाणीचा होता. प्लेगवर 'उपाय आणि लस' दोन्ही ताबोडतोब हवे होते. हाफकिनला ग्रँट मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेचे एक दालन उपलब्ध करून देण्यात आले. सोबत काही मदतनीस दिले. हाफकीन न थांबता आपले प्रयोग करण्यास सुरुवात केली.

प्लेगचे जंतू घेऊन हाफकिनने काही दिवस ते वाढू दिले. या वाढलेल्या जंतुना त्याने प्रथम क्लोरोफॉर्म दिला आणि नंतर त्यांना मृत केले. हे मेलेले जंतू हीच हाफकिनची प्लेगवरची लस होती. काही उंदरावर त्याने ही लस टोचून प्रयोग करून पाहिला. लस टोचलेले उंदीर खणखणीत बरे झाले. हाफकीनच्या मेहनतीला यश प्राप्त होण्यास सुरुवात झाले; पण हे इथे थांबणारे नव्हते. 

आता पुढचा प्रयोग माणसावर करायचा होता. पण या महाभयानक रोगाची परीक्षा घ्यायला कोणीही तयार होत नव्हत. लोक अशिक्षित असल्यामुळे कोणीही पुढाकार घेत नव्हते. वेकुटीस येऊन अखेर हाफकिनने स्वतःच ते हलाहल चाखायच ठरवलं. मुंबईच्या लाखो लोकांचं दैव बलवत्तर आणि सदैव की त्याचा प्रयोग यशस्वी ठरला. हाफकिनची प्रयोगशाळा गव्हर्नरच्या प्रशस्त राजवाड्यात हलवण्यात आली. पण अजूनही काही महाअडथळे बाकी होते. हिंदू धर्मातील अनेकांनी आपण शाकाहारी असून ही लस टोचून घेण्यास नकार दिला. हे ऐकून सर्व यंत्रणा हतबल झाली. 

जुन्या अंधश्रद्धाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांनी लस टोचून घेण्यापेक्षा नवस बोलून हा रोग आटोक्यात येईल, असा गैरसमज झाला होता. या उलट पारशी समाजातील रोग रांगा करून दिवसातून दोनदा ती लस घेऊ लागले. याचा परिणाम असा झाला की मृतांमध्ये प्रचंड प्रमाण हिंदूंचे होते त्यामानाने पारसी लोक अभावानेच आढळून आले. हाच प्रकार पुण्यामध्येही झाला. जवळपास ७ लाख लोक या रोगामुळे मृत्युमुखी पडले.

देवदूत बनून आलेल्या हाफकिनचे मुंबईवर प्रचंड उपकार आहेत. जिथे त्याची प्रयोगशाळा होती त्या गव्हर्नरच्या बंगल्याचे त्याच्या स्मरणार्थ हाफकिन इंस्टीट्युट असे नामकरण करण्यात आले. भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था म्हणून हाफकीनची संस्था भारतात उदयास आली. या संस्थेसाठी 2018 साली फडणवीस सरकारने औषध निर्माण महामंडळासाठी तसेच विविध जीवन रक्षक लस व औषध निर्माण करण्यासाठी राज्य सरकारमार्फत 100 कोटी रुपयांचा निधी दिला. 

कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाऱ्याच्या वेगाने वाढत आहे, जगाच्या सर्व यंत्रणा हतबल झाल्या आहेत. काही देश लॉकडाऊन केले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईसह देशाला आणि प्रामुख्याने जगाला कोणीतरी वाचवले अशा डॉ. वाल्डेमेर हाफकिनची अत्यंत गरज आहे, हे नक्की.

  • अशा अनेक रंजक माहिती समजून घेण्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये तुमचा विषय नक्की कळवा.