माझी मुंबई आज शांत आहे. सगळेजण भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. कोणाकडेच घरात राहाणे सोडून दुसरा पर्याय नाही. 21 दिवसांचा लागलेला लॉक डाऊन पुन्हा वाढणार की तिथेच संपणार, हेसुद्धा सद्यस्थितीत कोण सांगू शकत नाही. आता त्यात अजून एक भीती समोर येत आहे. ती म्हणजे जगात 1 नंबरला असलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोना शिरला तर?
MH01 म्हणून धारावीची ओळख आहे. जगात लोकसंख्या आणि अनेक कारणांमुळे धारावी पहिल्या नंबरला आहे. 6 लाखाहून अधिक लोकवस्ती 175 हेक्टरमध्ये पसरलेल्या मुंबईच्या एकट्या धारावी झोपडपट्टीत आहे. घनतेनुसार अनुमान लावला तर हीच संख्या 8 लाखांहून अधिक जाते. कोणतीच यंत्रणा ही संख्या व्यवस्तीशीर सांगू शकली नाही; पण मुद्द्याच बोलायच झाल्यास या 8 लाखांहून अधिक असलेल्या वस्तीत 1 कोरोना व्हायरसचा रुग्ण शिरला तर?
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना व्हायरसची संख्या आजकाल वाढत चालली आहे. त्यामुळे त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा त्याची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन हा एकमेव पर्याय प्रशासनासमोर दिसत आहे, पण हे सुरू असताना मुंबईत संख्या का वाढत चालली आहे, याचं एकमेव कारण म्हणजे मुंबईकरांचा बेशिस्तपणा.
अनेक लोक अनेक कारणांमुळे बाहेर पडत आहेत. मुंबईच्या अनेक भागांतून रुग्ण समोर येत आहेत. त्यातच हा रोग पर्सन टू पर्सन पसरत चालल्याने भितीचं मोठं वातावरण आहे. चिनमध्ये, इटलीमध्ये आणि सध्या भारतामध्येदेखील हेच होत आहे. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे हा व्हायरस पसरत चालला आहे आणि ती साखळी एकमेकांचे संबंध तोडून तुटू शकते.
ही साखळी एखाद्या इमारतीमध्ये तुटू शकते, कारण तिथे कोण कोणाचा नसतो. मात्र धारावीच्या झोपडपट्टीमध्ये सगळेच एकमेकांचे असतात. प्रत्येकदिवशी प्रत्येक माणूस कोणाच्या ना कोणाच्यातरी संपर्कात येत असतो. जर असाच एक कोरोनाग्रस्त रुग्न या धारावीच्या झोपडपट्टीतील एका व्यक्तीच्या संपर्कात आला तरी संपुर्ण धारावीला कोरोना होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे अख्खी मुंबई जाऊ द्या, फक्त धारावीच्या वंटास मुंबईकरांसाठी एक कळकळीची विनंती आहे की घरी बसा, आराम करा, काळजी घ्या आणि कोरोनापासून दूर राहा.
अनेकांना त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सतावत असेलच, आम्हीही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, मात्र आज तुम्ही घरी राहून ही साखळी तोडलीत, तर अख्ख आयुष्य तुम्ही पैसाच पैसा कमवू शकता. काही दिवस फक्त स्वत:ला सावरा. बाकीच्यांचं सोडून द्या, फक्त मला कोरोना नाही, झाला पाहिजे ही भावना मनात असू द्या.


0 Comments