गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत आहे. चीन मधून पसरलेल्या रोगाने आतापर्यंत संपूर्ण जगात पाच हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे जग एका मोठ्या संकटात सापडल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीनमधून पसरलेला कोरोना दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात धडकला. महाराष्ट्र सरकार या रोगाशी दोन हात करताना आपले सर्व पर्याय अवलंबत आहे. जगात हा रोग पसरण्याचा वेग जास्त असल्याने मुंबईत देखील या रोगाने थैमान घातले आहे. हा रोग पसरल्यामुळे मुंबईतल्या सर्व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मुंबईमध्ये असलेला रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात एका 64 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
हा रोग हवेच्या मार्फत पसरत असल्यामुळे सर्वात जास्त धोका मुंबईसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये जाणवत आहे.
दरदिवशी 70 लाख प्रवाशी मुंबईची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलने प्रवास करत असतात, यामुळे मुंबईतील नागरिकांना या संक्रमित होणाऱ्या कोरोना वायरसची बाधा होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचीच खबरदारी घेत प्रायोगिक तत्वावर मुंबईतील संपूर्ण लोकल बंद करण्याचा निर्णय लवकरच राज्य सरकार घेऊ शकते. यामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णपणे ठप्प होऊन मुंबईकरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
आजवरच्या इतिहासात सर्वांनी ऐकलेलं आणि वाचलेलं देखील आहे की मुंबई आणि मुंबईची लोकल ही कोणासाठीही थांबत नाही, परंतु कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे हा निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल बंद केल्याने कोरोनाचा मुंबईतील वाढते संक्रमण कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईची जीवन वाहिनी मुंबई लोकल असल्यामुळे समजा मुंबई लोकल बंद झाली तर मुंबई बंद होण्याची नामुष्की मुंबईवर येणार आहे. या रोगाच्या प्रसारामुळे इटली, चीन, अमेरिका असे अनेक देश बंद केले आहेत. जर सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने मुंबई बंद झाली, तर मोठे आश्चर्य वाटण्याचे कोणतेही कारण मुंबईकरांसाठी नसावे.
समजा मुंबई बंद झाली तर?
- मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. सध्यस्थितीत देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, मुंबई बंद झाली तर अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे कोलमडून देशाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
- शेयर बाजारामध्ये अजून मोठ्या प्रमाणात मंदी पाहायला मिळेल आणि या मंदीमुळे देशावर अनेक वर्षे गोंगावत असणारे महासंकट अजून वाढेल.
- मुंबईमध्ये इतर देशासह भारतातील अनेक राज्यातून लोक येत असतात. या सर्व नागरिकांना घरी बसण्याची नामुष्की उदभावेल.
- मुंबईच्या मंगलदास, दादर भुलेश्वर या ठिकाणाहून महाराष्ट्रातील इतर शहरात कापडांची आयात-निर्यात होत असते, त्यामुळे मुंबई बंद झाली तर याचा सर्वात जास्त परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्राला उदभावेल.
- दादर येथे सकाळी फुलांचे मार्केट भरत असते. या बंदचा फटका हा या मार्केटलादेखील बसू शकतो.
- मुंबईतील लोक असं बोलतात की मुंबईमध्ये येणारा कोणताही माणूस उपाशी राहात नाही. परंतु याच लोकांवर उपास1मारीची वेळ येऊ शकते.
- मुंबई, फिल्म इंडस्ट्रीचे मुख्य केंद्रबिंदू असून करोनामुळे दररोजचे शूटिंग,वेब सिरीज बंद करण्यात आले असून यामुळे निर्माते/कलाकार यांचे नुकसान होत आहे. या नुकसानात भर पडून अजून फिल्म इंडस्ट्रीचे नुकसान होऊ शकते. मराठी व हिंदी मालिका यांचे चित्रीकरण हे सर्वात जास्त हे मुंबईत चालू असते यामुळे यावर परिणाम होऊ शकतो.
- महाराष्ट्राचे परिवहन मंडळ आधीपासून तोट्यात आहे, त्याच्यात मुंबई बंदचा फटका एसटी मंडळाला बसू शकतो.
- सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे पूर्वस्थितीत येण्यास वेळ लागेल आणि बेरोजगारांच्या आकड्यात भर पडेल. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी माणसाला जास्त फटका बसलेला पाहायला मिळेल, यात खेदाची बाब म्हणजे मुंबईमध्ये सद्य परिस्थितीमध्ये केवळ 13 टक्के मराठी लोक स्थायिक आहेत.




0 Comments